Skip to main content

गेली १० वर्षे: ब्लॉगच्या अनुषंगाने माझा प्रवास


मी हा ब्लॉग २०१० मध्ये सुरू केला. तेव्हा त्याचं नाव स्वच्छंदी असं होतं. आणि मग २०१५ मध्ये याचं नाव सात्मन् असं बदललं. ह्या ब्लॉग वर शेवटची पोस्ट २०१६ मध्ये लिहिली आहे. आणि आज आपण २०१९ मध्ये आहोत. ह्या १० वर्षांच्या कालावधीत काय काय झाले ह्याचा हा धांडोळा!

[Read this post in English: My journey through my blog]

२०१० मध्ये मला "व्यक्त" व्हायचे होते. त्यासाठी मी हा ब्लॉग स्वच्छंदी या नावाने सुरु केला. काही वर्षांनी माझ्या असं लक्षात आलं की मी काही स्वच्छंदी वगैरे नाहीये. स्वच्छंदी ही फारच युटोपियन संकल्पना आहे. स्वच्छंदी आयुष्य हे फक्त 'ठरलं आणि झालं' असं मिळवता येत नाही. जून २०१० मध्ये मी माझ्या अभियांत्रिकी कॉलेजच्या प्रवेशाची वाट बघत होते. मी बारावीमध्ये जास्त काही अभ्यास केला नाही. तेव्हा मी थोडेफार यमक जुळवून "कविता" लिहायचे. लोकं कॉमेंट्स वगैरे करायचे. त्यामुळेच कदाचित २०१०-११ मध्ये सगळ्यात जास्त पोस्ट्स लिहिले गेले. 

२०१० मध्ये माझं इंजिनिअरिंगचं कॉलेज सुरू झालं खारघरला! वाढलेला प्रवास, नवीन वातावरण आणि नवीन मित्र-मैत्रिणी ह्यात कुठेतरी मला माझा सूर सापडू लागला. २०१२ च्या अखेरीस माझं पोस्ट्स लिहिणं थांबलं. 
मी २०१४ मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करायला लागले. स्वतःचे पैसे स्वतः खर्च करू लागले. पैसे साठवू देखील लागले. स्वतःच्या आयुष्यावरचा अधिकार कुठेतरी वाढत गेला. हळूहळू स्वच्छंदी ह्या ओळखीतला फोलपणा लक्षात येऊ लागला. तो एक एस्केप होता! २०१५ मध्ये मी ह्या ब्लॉग चं रंगरूप बदललं आणि नाव बदलून सात्मन् असं केलं. स्वतःला आत्मसात करायचा एक प्रयत्न!

माझ्या आयुष्याचा आलेख हा मी ह्या ब्लॉगच्या पोस्ट्स सोबत मांडू शकते. उधार घेतलेली ओळख, त्या ओळखीच्या विरोधात चाललेला आंतरिक संघर्ष, स्वीकारलेले अपयश आणि मग त्यातून घेतलेली भरारी!

त्यानंतर मी इंस्टाग्राम आणि फेसबुक वर अधिक व्यक्त झाले. खूप सारे फोटो टाकले आणि लांब लांब कॅप्शन लिहिले. बरेचसे लोक फॉलो करू लागले. २०१७ मध्ये नोकरी सोडून ५ महिने फिरायला गेले. नेपाळ, बाली, व्हिएतनाम आणि भारत फिरले. खूप काही बघितलं; नवीन जागा, व्यक्ती आणि वल्ली सुद्धा! ८ महिन्यांच्या खंडानंतर पुन्हा काम करायला लागले. आता पुन्हा मी २०२० मध्ये फिरायची स्वप्न बघतेय!

हेच ते स्वच्छंदी म्हणतात ते का?

- सात्मन्


Comments

Popular posts from this blog

विपश्यना : एक चिंतन

विपश्यनेचा दहा दिवसांचा कोर्स करून आज पाच दिवस झालेत. याबद्दल लिहायचं हे नक्की होतं, पण गेले काही दिवस काय लिहू हे समजतच नव्हत. प्रत्येक व्यक्तीचा अनुभव हा वेगळा असतो कारण प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते. म्हणूनच मला सर्वसमावेशक असं काहीतरी लिहायच होतं. आता बसलेय लिहायला... सर्वात आधी, विपश्यना म्हणजे काय?

आयुष्यात पुढे जायचं असतं...!

आज लिहावंसं वाटतंय... किंवा कदाचित कॉम्प्युटर रडत-खडत चालतोय म्हणून  असेल...  हे लिहिणं आता जमेनासं झाल्यासारखं भासतंय... स्वत:बद्दल बरंच काही बदलल्यासारखं जाणवतंय, सभोवतालचं जग देखील बदलल्यासारखं वाटतंय... असं वाटतंय की या सगळ्या बदलांत आपण कुठेच नव्हतो आणि आज अचानक यात पडलोय, एखाद्या अनभिज्ञासारखे! सगळं नवीन! पण जुन्या जगाची आठवण करून देणारं ... तिथे परत जाण्याची आस निर्माण करणारं... कुठेतरी किंवा कधीतरी ते जग परत येईल अशी आशा निर्माण करणारं... वेगळं! पुन्हा नव्याने सुरुवात कर, असं सांगायचं असेल त्याला... पण ना काही पूर्वसूचना, ना मार्गदर्शक इशारा... विशाल महासागरात हरवलेल्या बोटीच्या खलाश्यासम... एकटं, स्वबळावर! पण त्या खलाश्याच्या मनातील विजीगिषु वृत्ती आपण कशी जागवणार... त्याला वेड असतं... तो त्याचे स्वप्न पूर्ण करायच्या इच्छेपोटी वेडा होऊन जातो... स्वत:ला हरवून बसतो! त्या नाविन्याच्या शोधात असं स्वत: हरवून जाण्यात ते सुख तरी काय असतं? स्वत:ला शोधण्यात वेळ व शक्ती दोन्ही खर्च होतेच, पण मग हे काम युक्तीने चालवावं तरी कसं! युक्तीने संपूर्ण जग खरंच चालू शकतं का? आणि जर ते चा

शाळा = निरागसता !

" त्यादिवशी मला कळलं की शाळेची मजा कशात आहे ते. वर्ग आहेत , बाकं आहेत , पोरं-पोरी आहेत , सर आहेत , गणित आहे , भूगोल आहे , नागरिकशास्त्र सुध्दा ; पण आपण त्यात कशातच नाही. आपण त्या गाईंच्या पाठीवर बसणार्‍या पांढर्‍या पक्ष्यांसारखे मुक्त आहोत. त्यांच्या शाळेत बसलेलो असलो तरी आपल्या मनात एक वेगळीच शाळा भरते. खास एकट्याचीच. त्या शाळेत वर्ग नाहीत , भिंती नाहीत , फळा नाही , शिक्षक नाहीत ; पण त्यातलं शिकणं फार सुंदर आहे..." :) शाळा चित्रपटाने मला काय दिलं??? तर बऱ्याच दिवसांनी काहीतरी गोड, निरागस आणि तरल गोष्ट ऐकल्याचा, पाहिल्याचा आनंद! :) आणि शाळा कादंबरीने मला काय दिलं होतं, तीच गोष्ट वाचल्याचा आनंद...! शाळा कादंबरी ही बहुतेकांच्या आवडत्या पुस्तकांतील एक आहे, अर्थात माझ्याही!!! ते पुस्तक वाचून आता दीड वर्षं झाली, पण सगळं कसं अगदी मनावर कोरलं गेल्याप्रमाणे लख्ख! क्षणात वेड लावलं कादंबरीने... आणि मग कुठेतरी ऐकिवात आलं की शाळा कादंबरीवर सिनेमा येणारेय... एवढा आनंद झाला म्हणून सांगू! म्हणजे जी पात्र, ज्या जागा आणि ज्या भावनांची आपण निव्वळ एक कल्पना केली होती, ते विश्व दृ