Skip to main content

मैत्रीचे ठसे

काही नाती खरंच परिपूर्ण असतात,
सर्वदूर असूनही जवळ भासतात,
दररोज न बोलताही आठवण काढतात,
रक्ताची नसूनही एकमेकांचं जग बनून जातात...

क्वचितच भेटतात,
पण भेटल्यावर धमाल उडवून देतात,
जुन्या आठवणी उगाळून खिदळत बसतात,
आणि पुढील भेटीसाठी आस लाऊन धरतात...

एकमेकांची उणीदुणी काढतात,
एकमेकांच्या जयावर पुन्हा टाळ्या पिटतात,
पूर्वी ओढावलेल्या पराजयावर जरा अश्रू ढाळतात,
आणि जुने बंध पुन्हा एकदा घट्ट करतात...

एकमेकांकडे थोड्याश्या आश्चर्यानेच बघतात,
काहीजण कसे बदलले याचा लेखाजोगा मांडतात,
तर काहीजण अजूनही कसे अगदी तसेच आहेत हे ताडतात,
आणि आपणच आपल्या नात्याचा तोल सांभाळतात...

एकमेकांच्या आठवणीत कायम झुरत असतात,
पण जेव्हा एकमेकांसोबत असतात तेव्हा एकमेकांचीच बनून जातात,
खरंच काही नाती किती परिपूर्ण असतात,
आणि हीच नाती परिपूर्ण मैत्रीचे ठसे पावलोपावली उमटवत असतात....

- मनाली साटम 
   ( ८ ऑगस्ट, २०११ ) 
  

Comments

Popular posts from this blog

विपश्यना : एक चिंतन

विपश्यनेचा दहा दिवसांचा कोर्स करून आज पाच दिवस झालेत. याबद्दल लिहायचं हे नक्की होतं, पण गेले काही दिवस काय लिहू हे समजतच नव्हत. प्रत्येक व्यक्तीचा अनुभव हा वेगळा असतो कारण प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते. म्हणूनच मला सर्वसमावेशक असं काहीतरी लिहायच होतं. आता बसलेय लिहायला... सर्वात आधी, विपश्यना म्हणजे काय?

आयुष्यात पुढे जायचं असतं...!

आज लिहावंसं वाटतंय... किंवा कदाचित कॉम्प्युटर रडत-खडत चालतोय म्हणून  असेल...  हे लिहिणं आता जमेनासं झाल्यासारखं भासतंय... स्वत:बद्दल बरंच काही बदलल्यासारखं जाणवतंय, सभोवतालचं जग देखील बदलल्यासारखं वाटतंय... असं वाटतंय की या सगळ्या बदलांत आपण कुठेच नव्हतो आणि आज अचानक यात पडलोय, एखाद्या अनभिज्ञासारखे! सगळं नवीन! पण जुन्या जगाची आठवण करून देणारं ... तिथे परत जाण्याची आस निर्माण करणारं... कुठेतरी किंवा कधीतरी ते जग परत येईल अशी आशा निर्माण करणारं... वेगळं! पुन्हा नव्याने सुरुवात कर, असं सांगायचं असेल त्याला... पण ना काही पूर्वसूचना, ना मार्गदर्शक इशारा... विशाल महासागरात हरवलेल्या बोटीच्या खलाश्यासम... एकटं, स्वबळावर! पण त्या खलाश्याच्या मनातील विजीगिषु वृत्ती आपण कशी जागवणार... त्याला वेड असतं... तो त्याचे स्वप्न पूर्ण करायच्या इच्छेपोटी वेडा होऊन जातो... स्वत:ला हरवून बसतो! त्या नाविन्याच्या शोधात असं स्वत: हरवून जाण्यात ते सुख तरी काय असतं? स्वत:ला शोधण्यात वेळ व शक्ती दोन्ही खर्च होतेच, पण मग हे काम युक्तीने चालवावं तरी कसं! युक्तीने संपूर्ण जग खरंच चालू शकतं का? आणि जर ते चा

शाळा = निरागसता !

" त्यादिवशी मला कळलं की शाळेची मजा कशात आहे ते. वर्ग आहेत , बाकं आहेत , पोरं-पोरी आहेत , सर आहेत , गणित आहे , भूगोल आहे , नागरिकशास्त्र सुध्दा ; पण आपण त्यात कशातच नाही. आपण त्या गाईंच्या पाठीवर बसणार्‍या पांढर्‍या पक्ष्यांसारखे मुक्त आहोत. त्यांच्या शाळेत बसलेलो असलो तरी आपल्या मनात एक वेगळीच शाळा भरते. खास एकट्याचीच. त्या शाळेत वर्ग नाहीत , भिंती नाहीत , फळा नाही , शिक्षक नाहीत ; पण त्यातलं शिकणं फार सुंदर आहे..." :) शाळा चित्रपटाने मला काय दिलं??? तर बऱ्याच दिवसांनी काहीतरी गोड, निरागस आणि तरल गोष्ट ऐकल्याचा, पाहिल्याचा आनंद! :) आणि शाळा कादंबरीने मला काय दिलं होतं, तीच गोष्ट वाचल्याचा आनंद...! शाळा कादंबरी ही बहुतेकांच्या आवडत्या पुस्तकांतील एक आहे, अर्थात माझ्याही!!! ते पुस्तक वाचून आता दीड वर्षं झाली, पण सगळं कसं अगदी मनावर कोरलं गेल्याप्रमाणे लख्ख! क्षणात वेड लावलं कादंबरीने... आणि मग कुठेतरी ऐकिवात आलं की शाळा कादंबरीवर सिनेमा येणारेय... एवढा आनंद झाला म्हणून सांगू! म्हणजे जी पात्र, ज्या जागा आणि ज्या भावनांची आपण निव्वळ एक कल्पना केली होती, ते विश्व दृ